
कव्हा-मव्हा चिमण्या आमच्या वर्गात यायच्या, आमचा वर्ग मारोतीच्या माळवादी देवळात भरायचा…. गुर्जींनी शिकावल्यालं चिमण्या निमूट ऐकायच्या…. वर्गात गंमत करायची म्हणून सरस्वतीच्या फोटूमागून कायतरी गबाळ सारखं पोरांच्या डोक्यावर टाकायच्या आन नाजूक चिवचिवाट करायच्या… कव्हा-कव्हा गुर्जीनचं शिकावनं पटलं नाय की, कलकलाट करायच्या… तव्हा गुर्जी म्हणायचे," ये कार्ट्यांनो ह्या चिमण्या बाहेर हाकला" आम्ही समदी पोरं चिमण्या हकलायचो…. त्या एका बोळातून बाह्यार जायच्या आन दुसऱ्या बोळातून परत आत यायच्या….गुर्जी हैराण झाले की म्हणायचे, "पोरांनो आता पाढ म्हणा …. " मग आम्ही मोठ्या आवाजात पाढ म्हणायचो…. आमच्या आवाजात चिमण्यांचा आवाज विरुन जायचा…
….

पण … आत्ता चिमण्यांची साळा भरत नाय… कारण साळा भरण्याइतकी त्यांची पटसंख्या राहिली नाय… म्हणून त्यांच्या सरकारनं त्यांची साळाच बंद करून टाकली…
मी कधी गावाकड गेलो की एखाद्या खुरट्या झाडावर बसून एखादी चिमणी जुनाट कविता म्हणतांना दिसते…, मी जवळ गेलो की ती भुरकून उडून जाते…, कारण तेवढा जिव्हाळा आता राहिला नाही.…
_ भाऊराव कऱ्हाडे
No comments:
Post a Comment