Saturday, 4 April 2015

चिमण्यांचीबी साळा


मी जव्हा साळत जात व्हतो, तव्हा आमच्या बराबर चिमण्यांचीबी साळा भरायची. माही साळा आमच्या रानापासून दोन मैलावर व्हती . आमची साळा सुटायची तव्हा चिमण्यांची पण साळा सुटायची. साळा सुटल्यावर आम्ही उड्या मारीत घाराकड पळायचो तव्हा चिमण्यांच थवंच्या-थवं अवती-भवती गलका करत भिरभिरायचं…. चिमण्या मला इच्यारायच्या…. " तुमच्या मास्तरनं काय शिकावलं ?" मी म्हणायचो, "कविता.., कव्हा पाढा.., कव्हा गणितं.., …. पार डोक्याचा भुगा …! " तव्हा चिमण्या म्हणायच्या… " तुमच्या पुस्तकातल्या चिमण्यांची लय मज्जा अस्ती राव…. " मी म्हणायचो…. "का ? " तव्हा त्या म्हणायच्या … " तुमच्या पुस्तकातली शिवारं सदा हिरवीगार….शेतातील कणसं दाण्यांनी भरलेली असत्यात… आत्ता आम्हाला दाण्यासाठी लै भरकटावं लागतं." तव्हा मी निस्ताच मिळमिळीत हसायचो… "तुमच्या गुर्जीनं काय शिकावलं म्हणायचो …?" त्या सांगायच्या, " आमचं गुर्जी आम्हाला निस्ती गाणी शिकावत्यात, तुमच्या  गुरुजीं सारखी गणितं त्यांला येत नाय…."

     कव्हा-मव्हा चिमण्या आमच्या वर्गात यायच्या, आमचा वर्ग मारोतीच्या माळवादी देवळात भरायचा…. गुर्जींनी शिकावल्यालं चिमण्या निमूट ऐकायच्या…. वर्गात गंमत करायची म्हणून सरस्वतीच्या फोटूमागून कायतरी गबाळ सारखं पोरांच्या डोक्यावर टाकायच्या आन नाजूक चिवचिवाट करायच्या… कव्हा-कव्हा गुर्जीनचं शिकावनं पटलं नाय की, कलकलाट करायच्या… तव्हा गुर्जी म्हणायचे," ये कार्ट्यांनो ह्या चिमण्या बाहेर हाकला" आम्ही समदी पोरं चिमण्या हकलायचो…. त्या एका बोळातून बाह्यार जायच्या आन दुसऱ्या बोळातून परत आत यायच्या….गुर्जी हैराण झाले की म्हणायचे, "पोरांनो आता पाढ म्हणा …. " मग आम्ही मोठ्या आवाजात पाढ म्हणायचो…. आमच्या आवाजात चिमण्यांचा आवाज विरुन जायचा… 
…. 




पण … आत्ता चिमण्यांची साळा भरत नाय… कारण साळा भरण्याइतकी त्यांची पटसंख्या राहिली नाय… म्हणून त्यांच्या सरकारनं त्यांची साळाच बंद करून टाकली… 
मी कधी गावाकड गेलो की एखाद्या खुरट्या झाडावर बसून एखादी चिमणी जुनाट कविता म्हणतांना दिसते…, मी जवळ गेलो की ती भुरकून उडून जाते…, कारण तेवढा जिव्हाळा आता राहिला नाही.… 

_ भाऊराव कऱ्हाडे




No comments:

Post a Comment