Friday, 10 April 2015

बैल गाडा...


दाम्यानं नुक्त्याच व्यालेल्या खिला-या गाई म्होरं शिजवल्याल्या बाजरीच घमेलं ठेवलं..,अन बापानं सांगितल्यापरमानं वासराचं वशिंड दातात धरून ऊपटलं ....आता गो-ह्याचं वशिंड डौलदार बनणार होतं. धडपडत ते वासरू गाईच्या कासंला चिकटत होतं. दावनीला आणखी दोन आंडील गो-ही कवली मका खात होती. दाम्या इचार करत दगडावर टेकला होता. मनात तळतळत होता. वट्यावर चिलमित गांजा भरीत बाप श्या देत होता. 



दिवाळी सरली तसं रान पिवळ झालं, आन गावगावच्य जत्रान्ना ऊत आला.पण पहिल्यासारखी मज्जा जत्रान्ना राहिली नव्हती. त्याचं कारण म्हंजे दोन वर्षापूर्वी सरकारनं बैलगाडा शर्यती बंद केल्या आणी तीन-तीन दिवस चालणा-या जत्रान्ना "ख्वाडा" बसला. त्यामुळ गारिगार वाल्यापसून फिरना-या मोठया पाळन्याच्या व्यवसयीकानच्या पोटाला पिळ पडला....., त्यात सगळ्यात मोठा "ख्वाडा" बसला तो शेतक-यांना. त्यांनी शर्यतीकरता जीव लाऊन तयार केलेली जातवान वासरं गोठ्यात फक्त दावनीला बांधून होती. त्यांना धड औताला जुपता येइना. कारण शेतात काम करणारी बैलं वेगळी आन घाटात पळणारी वासरं वेगळी. आज समदा शेतकरी वासरांना चारापाणी करताना त्यांच्या गळ्यात पडून ढसाढसा रडतोय. कारण रक्ताचं पाणी करून तयार केलेली ही वासरं चांगल्या रकमांना विकण हा लहान-सहान शेतका-यांचा मुख्य जोडधंदा बनला होता पण ............!




एकतर सबंध भारतीय शेतक-यांची अवस्था म्हंजे "मुकी धरली हाक ना बोंब" त्यामुळ बिचारी बैलं सुद्धा आपल्या आन्नदात्याची अवस्था पाहून डोळ्यात पाणी आणून सळसळणारे पाय झाड़त निस्ती गोठ्यात उभी. त्यांना सुदा घाटात घूमना-या आरूळ?बरं चौखार उधळ!यची सवं पण ........!
एक डौलदार वशिंडाचा गो-हा दाम्याचं गाल चाट्त होता. आन ते तान्हं वासरू हरणागत टणाटणा उड्या मारत कावर-बावरं होउन दोघांची केविलवाणी अवस्था बघत होतं......










पण आता दाम्याला त्या गोंडस वासराला गोंजरावं वाटत नव्हतं..,कारण पोटच्या पोराप्रमाण जीव लाऊन तयार केलेलं हे वासरू ऊदया घाटात पळवायचं नाय मंग सोडायचं कुणावर...?
बापाचा श्याचा तडाखा चालूच होता. दाम्या खाकरून उठला, हातात वीळ! आन कासरा घेउन तडातडा निघाला. बैलं टवकारून त्याच्याकडं पहात होती........... (क्रमशः)



 लेखक -भाऊराव क-हाडे

No comments:

Post a Comment